आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन :अहमदनगर महानगरपालिका यांच्यावतीने आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा शुभारंभ
नगर – केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जाहीर होत असतात. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय संस्था व राजकीय पक्षांना करायच्या असतात. त्याचबरोबर योजनांची माहिती देखील नागरिकांना होणे गरजेचे आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाइन माहिती नागरिकांना होत असते. याचबरोबर लाभार्थ्याचा अर्ज देखील ऑनलाईन भरता येतो. केंद्र सरकारच्या घरकुल व स्वच्छता अभियान या दोन योजना खर्या अर्थाने यशस्वी झाल्या आहे. घरकुल योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच स्वच्छता अभियानच्या माध्यमातून आपले नगर शहर कचराकुंडी मुक्त झाले असून, या योजनेच्या माध्यमातून आपल्या महानगरपालिकेला विविध पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या शहराचे नाव देशपातळीवर घेतले जात आहे. आपला संकल्प विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत योजना घेऊन जाण्याचे काम केले जाईल. त्याचे स्वागत आपण सर्वजण मिळून करूया, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संकल्प विकसित भारत यात्रेचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, सचिन बांगर, मेहर लहारे, सचिन पारखी, शशिकांत नजन, भाजपाच्या महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, प्रशांत मुथा, बाबासाहेब सानप, कालिंदी केसकर आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम झाले असून त्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी नगर शहरांमध्ये ठिकठिकाणी आपला संकल्प विकसित भारत यात्रा घेऊन जाण्याचे काम होणार आहे त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी अभय आगरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या असून त्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. या योजना फक्त कागदावर न राहता समाजामधील विषमता दूर करण्यासाठी यशस्वीपणे राबवल्या पाहिजे योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खर्या अर्थाने प्रशासनाचे असते त्यांच्या माध्यमातून समाजाला मदत होत असते असे ते म्हणाले. आपला संकल्प विकसित भारत या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती समाजाला व्हावी यासाठी आज आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये आयुष्यमान भारत योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, अन्न सुरक्षेची हमी शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती आदिवासी समुदायासाठी सन्मान हक्क आणि संधी योजना स्टार्ट ऑफ इंडिया ऐतिहासिक स्थळाचे पुनरुज्जीवन महाराष्ट्र कुस्ती सर्किट राष्ट्रीय महामार्ग बांधणी अमृत भारत योजनेअंतर्गत १२६ रेल्वे स्थानकावर सुविधा वाढवल्या जात आहेत. तसेच पाच वंदे भारत गाड्या सुरू आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे ८५ किलोमीटर कामाचा लोकार्पण सुरू झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १८२ गावांना लाभ होणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण युवकांचे सक्षमीकरण सुरू आहे. यावेळी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.