अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस लढविणारच : सौ.मंगल भुजबळ

0
87

नगर – अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे. आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ओबीसींची संख्या जास्त असलेल्या मतदासंघात काँग्रेसने जागा लढवाव्यात, अशी मागणी २ महिन्यांपूर्वी केली होती व त्याचा सतत पाठपुरावा देखील केला होता त्यानुसार त्यासंदर्भात ५ जानेवारी ला दिल्ली येथे २४, अकबर रोड काँग्रेस कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी कार्यकारिणीची आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली व ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.त्या बैठकीत महाराष्ट्रातील ओबीसींची संख्या जास्त असलेल्या ६ लोकसभा मतदारसंघातील अहवाल मागविला गेला असून त्या लोकसभा मतदारसंघावर चर्चा करून ते मतदासंघ लक्ष केंद्रित करून त्या जागा काँग्रेसने लढविण्याची रणनीती आखली जाणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी संख्या जास्त असलेल्या ६ लोकसभा मतदासंघात अहमदनगर दक्षिण लोकसभेचा समावेश असून दक्षिण लोकसभेच्या माहितीचा अहवाल मागविला गेला आहे. या ६ लोकसभेच्या माहितीच्या अहवालाच्या प्रती या नवी दिल्ली येथे मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहूल गांधीं, सोनिया गांधी, राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल, राष्ट्रीय ओबीसी,एससी, एसटी प्रभारी के राजु व अजयसिंह यादव यांना दिल्या जाणार असून जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा हे स्लोगन रिपोर्ट ला लावुन रिपोर्टचे प्रेज़ेंटेशन दिल्ली येथे केले जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी व पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने आता पक्षश्रेष्ठींनी सुध्दा यात लक्ष घातले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात दक्षिण लोकसभा काँग्रेसला जिंकणे फार अवघड नाही तसेच या मतदासंघात राष्ट्रवादीचा १९९९ ते २०१९ या काळात एक टर्म सोडली तर सातत्याने पराभूत होत असल्याने यावेळेस ही जागा काँग्रेसला सोडल्यास बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात ही जागा काँग्रेस पक्ष नक्कीच जिंकेल, असा ठाम विश्वास असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.