अहमदनगर- शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ तसेच योजनांच्या अंमलबजावणीत संदर्भातील तांत्रिक अडचणींबाबत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कृषी कायद्यांबद्दल विविध प्रकारचे गैरसमज पसरवले जात असून शेतकर्यांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने बाजार समित्यांच्या अस्तित्वा बरोबरच शेतमालाला योग्य भाव मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. शेतीमालाच्या मूल्यवर्धन वाढीसाठी विविध प्रकारच्या योजनांची शेतकर्यांपर्यंत माहिती पोहोचणे गरजेचे आहे. शेतकर्यांना परिसरातील कृषी विद्यापीठांचा, कृषी विज्ञान केंद्र मधल्या संशोधनाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी लवकरच कृषी मंत्रालयाकडून पाऊले उचलली जातील, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे व त्या दृष्टीने लवकरच संबंधित विभागाकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी अपेक्षा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी पिक विमा मिळावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील थकीत पिक विमा मिळावा यासाठी थेट कृषिमंत्र्यांना साकडे घातले होते त्यांनी त्याबाबत सूचना दिल्यानंतर शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकर्यांच्या व्यापक हितासाठी काम करीत आहे, शेतकर्यांच्या वतीने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी कृषिमंत्री यांचे आभार मानले.